भीषण अपघात : कंटेनर-बोलेराेच्या अपघातात चौघे ठार; मृतांत चालक, दोन महिलांचा समावेश
मेहकर - नागपूर येथून मुलीची भेट घेऊन औरंगाबादकडे येणाऱ्या क्षीरसागर कुटुंबाच्या जीपला भरधाव कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात चालकासह चौघे ठार झाले. यात दोन महिलांचा समावेश आहे. शनिवारी रात्री १ वाजेच्या सुमारास नागपूर-औरंगाबाद महामार्गावर अंजनी बुद्रुक फाट्याजवळ हा भीषण अपघात झाला..
मूळ कन्नड येथील मनोहर क्षीरसागर औरंगाबादला स्थायिक आहेत. तीन दिवसांपूर्वी ते कुटुंबासह बोलेरो गाडीने विवाहित लहान मुलीला भेटण्यासाठी नागपूरला गेले होते. शनिवारी दुपारी ते परत निघाले. रात्री एकच्या सुमारास अंजनी बुद्रुक फाट्यावर समोरून येणाऱ्या कंटेनरने जीपला धडक दिली. पोलिस निरीक्षक राजू खर्डे यांनी अपघातानंतर नातेवाइकांशी संपर्क साधला. यानंतर क्षीरसागर यांचे साडू शशांक बीडकर व अन्य नातेवाइकांनी मेहकरच्या दिशेने धाव घेतली.
चौघांचा जागीच मृत्यू, मृतदेह क्रेनने काढले
मनोहर हरिभाऊ क्षीरसागर (७०), मुलगी मेघा क्षीरसागर (३५), पत्नी नलिनी मनोहर क्षीरसागर (६६) व चालक गजानन सुखदेव नागरे (२५) या चौघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चौघांचेही मृतदेह क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले.