शेकडो मासे मृत्युमुखी
भांडुप पश्चिमेकडील छत्रपती शिवाजी महाराज तलावातील शेकडो मासे मृत्युमुखी पडले असून, त्याविषयी संताप व्यक्त होत आहे. पालिकेने तलावाच्या साफसफाईकडे दुर्लक्ष केल्याने, तसेच काही अज्ञात व्यक्तींनी रस्त्यावरील साचलेले गटाराचे पाणी, परतीच्या पावसात वाहून आलेले डांबर तलावाच्या दिशेने वळवल्याने मासे मृत्युमुखी पडल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. गणपती विसर्जनानंतर मूर्तीवरील रासायनिक रंग पाण्यात मिसळत असल्यानेही हे घडल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
हा तलाव मुंबई महापालिकेच्या एस विभागाच्या अखत्यारित आहे. काही वर्षांपूर्वीच झोपडपट्टीच्या विळख्यातून या तलावाची सुटका करण्यात आली होती. मात्र, काही समाजकंटकांची कचरा टाकण्याची खोड आणि पालिकेकडून नियमित साफसफाईकडे झालेले दुर्लक्ष यामुळे सुशोभीकरण होऊनही तलाव उपेक्षित राहिला आहे. गणपती विसर्जनाच्या आधी साफसफाई आणि पुन्हा वर्षभर निर्माल्य- कचऱ्याचे साम्राज्य असे चक्र अनेक वर्षे सुरूच होते. मागील काही वर्षात हे चित्र बऱ्यापैकी बदलले असले तरी समस्येवर पूर्णपणे नियंत्रण मिळवणे पालिकेला शक्य झालेले नाही. तलावातील नैसर्गिक झरे देखील बुजवले गेल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तलाव परिसरात चार शाळा असल्याने विद्यार्थी, नागरिक आवडीपोटी तलावातील माशांना खाद्यपदार्थ टाकतात. त्यामुळे या तलावात मोठ्या प्रमाणात मासे होते. मात्र, रविवारी दुपारच्या सुमारास तलावाच्या किनाऱ्यावर शेकडो मृत माशांचा खच किरण गायचोर या दक्ष नागरिकाच्या दृष्टीस पडला. त्यानंतर तलावातील हे वास्तव सर्वांसमोर आले. काही महिन्यांपूर्वी तलावातील कासवही दगावल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली.
या तलावात दरवर्षी मोठ्या संख्येने गणपती आणि देवींच्या मूर्तींचे विसर्जन होते. हा विसर्जन सोहळा आटोपताच दरवर्षी तातडीने तलावातील पीओपी, निर्माल्य आदी साफ केले जाते. मात्र, यंदा ते झालेले नाही. त्यामुळे मूर्तींवरील रासायनिक रंग पाण्यात मिसळल्याने मासे मृत्युमुखी पडल्याचा दावाही अनेकांनी केला आहे.